Saturday, April 13, 2024

  योग ग्रंथ पाठ  4. 13/03/2024.  ध्वनी फीत . 





द्वैत / अद्वैत . 


द्वैत/अद्वैत या मध्ये मुलभूत प्रश्न एकच आहे. तो असा की ‘हे जग एका गोष्टी पासून बनले आहे कि दोन ?

’दागिने अनेक, सोने एक., मडकी अनेक माती एक,  पाने/फांद्या अनेक वृक्ष एक. 

शरीरे अनेक, आत्मा एक.  

वेदांत दर्शन किंवा उत्तरमीमांसा :- 

हे दर्शन हिंदूंच्या षड्दर्शनांपैकी सर्वात प्रसिद्ध, प्रमुख व जवळजवळ सर्वमान्य असे दर्शन आहे. याच्यानुसार ईश्वर
आणि सृष्टी या दोन वेगवेगळ्या वस्तू नसून, म्हणजे त्या दोघांत ‘द्वैत’ नसून ‘अद्वैत’ आहे. म्हणजे संपूर्ण सृष्टी व 
त्यातील सर्व सजीव ईश्वरमय आहेत. आत्मा व परमात्मा एकच आहेत,

त्रिगुण विचार चिंतन :

भगवद्गीतेत तीन गुण अध्यात्माच्या संदर्भात मांडले आहेत. या संकल्पनेचा पायाभूत विचार केला तर गुण म्हणजे काय, त्यांचा कशासाठी व कसा उपयोग करून घ्यावयाचा व ते समजून का घ्यायचे हे कळेल. या गुणांचा प्रभाव काय आहे, ते कसे बंधनात घालतात व त्यातून मोकळे होण्यास काय करायला हवे; मोकळे होण्याची तरी काय आवश्यकता आहे या सर्व गोष्टींचा काही विचार या पाठात  केला आहे. 

आपल्यात (माणसामध्ये) हे तीनही गुण असतात, मिश्र पद्धतीने ते आपल्या वर्तनातून वेळोवेळी व्यक्त होतात. पूर्ण सत्य, पूर्ण पराक्रमी आणि पूर्ण आळशी असा कोणी नाही. सत्व-रज-तम या गुणांचे मिश्रण म्हणजे आपण असतो. 
या मिश्रणात  बदल करण्यास माणसाला क्रियमाण स्वातंत्र्य व विवेक दिलेला आहे. त्याचा वापर करून कोणते गुण खाली ठेवून कोणते वर ठेवावे हे सारे माणूस ठरवू शकतो. 

संतसुद्धा सामान्य माणूस म्हणून जन्माला येतात. ते जन्माला येताना संत म्हणून येत नाहीत;  तर कष्टाने, प्रयत्नाने व साधनेने ते संतपदाला पोहोचतात. त्यांनी स्वतःला घडवून घेतले असते. त्यामुळे त्यांचा आदर्श पुढे ठेवून ते वागतात तसे वागणे हे साधनच आहे.

प्रारब्ध

संचित, प्रारब्ध व क्रियमाण या त्रिगुणांना  आपल्या स्वाधीन करणे हा साधनेचा भाग आहे. मुळात आपल्याला विशिष्ठ पद्धतीचे गुण मिश्रण जन्मतः कसे मिळते ,  हे समजण्यासाठी “प्रारब्ध” हि संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. 

यावरील काही चिंतन आपण या पाठात ऐकू शकाल. 


विजय रा. जोशी. 

















Thursday, April 11, 2024

 योग ग्रंथ पाठ  3. : 6 th MARCH ‘ 2024 .  ध्वनी फीत


ध्वनिफीत ऐकण्यासाठी वर क्लीक करा. 



साध्य आणि साधन - साधकत्वातील प्रगती - साधकाचा क्रम विकास .

अभ्यास :

करुणा सर्वाभूती*   जिव्हे नामस्मृती*|

*नित्य शोधणे सत्संगती*|  या नाव अभ्यास*||१ ||

*यथाभावे कीर्तन करावे*|  *दैवाचे वैभव नाचावे*|

*सत्किर्तन ऐकावे      या नाव अभ्यास*

अभ्यास केवळ आध्यात्मिक नसून व्यवहारातही चांगुलपणा कसा मिळवावा याचे तत्वच दिले आहे.

चांगले जगण्याचा पाया म्हणजे अभ्यास. हा संस्कृतमधला एक अर्थ. 

पुन्हा पुन्हा वर्तन करुन आत्मसात करणे….        तसेच चांगल्याची आस म्हणजे अभ्यास. 

यशस्वी जीवनासाठी,  अभ्यास महत्वाचा. 


प्रपंच परमार्थाच्या आड येत नाही

समर्थांनी मानवी जीवनाचा आणि परमार्थाचा समन्वय साधला आणि प्रपंच परमार्थाच्या आड येत नाही असे ठामपणे सांगितले म्हणूनच ते म्हणतात -

आधी प्रपंच करावा नेटका।

मग घ्यावे परमार्थ विवेका ।।

माणसाची सहजप्रवृत्ती प्रपंच नदीबरोबर वाहण्याची आहे. पण नदीच्या प्रवाहाला स्वत:चा उगम पाहाण्याचे भाग्य नसते. अनेक जन्माच्या सुकृत्याने जेव्हा मानव जन्म प्राप्त होतो तेव्हा त्याला बुद्धी मिळते. त्या बुद्धीच्या साहाय्याने मानवाला प्रपंचनदीचा प्रवाह पाहण्याचे भाग्य प्राप्त होते. म्हणजेच 'मी' कोण? कुठून आलो? ह्या प्रश्नांचा विचार करण्याचे सामर्थ्य त्याचे ठाई येते. 


भक्ती आणि ज्ञान 

यांचा झगडा निर्माण होऊ शकत नाही इतकी भक्ती श्रेष्ठ आहे.  हे कांही नवतत्वज्ञानाचें नवे मत किंवा पालटलेली धारणा नव्हे. ज्ञान हा लांबचा रस्ता, एका अर्थाने अपूर्ण, हे बुध्दीवादी मानतो.. श्रध्दा ही शंका रहित अवस्था त्याला पेलणारी वस्तु नाही, हे तो कबूल करतो. ज्ञान आधारित श्रद्धा  हा उत्तम पर्याय. 
माणूस आतून सुरक्षित पाहिजे. आंतरिक सुरक्षितता असली, तर बाहेरील  कोणतीही ताकद , प्रलोभने
माणसाला वाकवू शकत नाहीत.  आंतरिक सुरक्षितता श्रध्देतून व चांगल्या निश्चयातून अवतरते. 

काही लोकांना श्रद्धा हि वृत्ती स्वाभाविक असते, काहींना ती मिळवावी लागते. 
परमार्थात ज्ञानी माणसावरील श्रद्धा खूप महत्वाची असते. 

क्रमशः आपण काही संकल्पना समजून घेण्याचे चिंतन करीत आहोत. 


विजय रा. जोशी. 




Saturday, April 6, 2024

 योग ग्रंथ पाठ २. २८/०२/२०२४.  ध्वनी फीत  

(ऑडिओ साठी क्लिक करा)




योग ग्रंथ सार / साध्य   स्वामीजी. (शक्ती योग, २४०/४१)    स्वावलंबी साधना.


जे वाचले, ऐकले त्याचे चिंतन करावे, स्वतःच्या मनाची खात्री पटवावी आणि त्या प्रक्रियेने 

सर्व शरीर बदलते याचा अनुभव घ्यावा.

मात्र अट आहे ती नितियुक्त समता वर्तन हवे. असे वर्तन खरया स्वार्थाचा मार्ग आहे. 

तो तात्पुरता नकोसा वाटला तरी त्यानेच अनेक विघ्ने दूर होतील.

कोणत्याही माणसाला स्वतः आपली साधना सहज करता येईल. 

चार योग ग्रंथ हेच मर्म सांगतात आणि त्याचे पुरावे देतात. त्यातील विचार पत्करल्यामुळे

तुमच्या मनाला शांती, समाधान मिळेल, इतकेच नव्हे तर एकदा तुमच्या मनाने अहंकार

सोडला की तुमच्यातील चेतन शक्ती देखील साधना प्रयत्नाने तुमच्या ज्ञान शक्तीशी

resonate होईल. हा एक स्वावलंबी असा अपूर्व आनंद असेल. 


सर्व शरीर तेज शांतीने प्रस्फुटित झाल्याचा 

अनुभव येईल. ही अंतःस्थिती तुम्हाला बाहेरही शांती प्रतिष्ठा मिळवून देईल.


स्वामीजी निर्मित - न्यू वे फिलॉसॉफी , रूप रेषा तत्वज्ञानाचे सार - प्रार्थना .

(साध्य - साधन – स्पष्टता.     प्रयत्न दिशा दर्शन)


1. कर्म शुद्धी प्रार्थना.                                                 स्वतः साठी                  


2. आत्म कल्याण प्रार्थना.                                          स्वतः साठी                   


3. यज्ञ / प्रकाश प्रार्थना                                              स्वतः साठी / सर्वांसाठी.


4. विश्व कल्याण प्रार्थना.                                            स्वतः साठी / सर्वांसाठी


5. राष्ट्र कल्याण प्रार्थना                                               स्वतः साठी / सर्वांसाठी


6. समाज कल्याण प्रार्थना ..                                         स्वतः साठी / सर्वांसाठी....  



मनशक्ती तत्वज्ञानाचे सार.


स्वार्थासाठी निस्वार्थ.

सुखासाठी दुख स्वीकार.

मिळविण्यासाठी संकल्प आधारित त्याग.

सत्कर्म पालन, निरपेक्ष, निरहंकार, कर्तव्य भावनेने.


निष्काम कर्माने              चित्त शुद्धी. 

निष्काम उपासनेने         चित्त शांती . 

चित्त वृत्ती निरोधाने -       ध्यान शांती. 


हरी ओम. 


विजय रा. जोशी. 






 



 



Monday, April 1, 2024

 

 योग ग्रंथ  :  पाठ 1.



वरील ओळीवर क्लिक करा , आपल्याला ध्वनीफीत ऐकू येईल. 




मागाल ते मिळेल , पण......


ज्ञानेश्वरी मधील पसायदान , सगळ्या जगाच्या सुखासाठी मागणी मागते,  तेथेही अट 

“सत्कर्मी रती वाढो” अशा सत्कर्म व्रताची आहे. 

“मनाच्या श्लोक” मधेही हे पथ्य चुकलेले नाही. सुख भोगण्यासाठी माणूस सतत उतावीळ असतो,

इच्छुक असतो. त्यासाठी आयुष्यभर जीवतोड प्रयत्न करतो. त्या प्रयत्नात खर्च होणाऱ्या शक्तीपैकी

जरी निम्मी शक्ती त्याने सुख प्राप्तीचे नियम समजून घेण्यात खर्च केली तर त्याचे 

खरेखुरे कल्याण होईल. याबद्दल मार्गदर्शन मनाच्या श्लोकात आहे.  

इतरांच्या  कल्याणातच आपले खरे कल्याण आहे हे कळते पण वळत नाही .

आत्मचिंतनाच्या, आत्मपरीक्षणाच्या काही सुवर्ण-क्षणांना हे आपल्याला पटते पण दुर्दैवाने त्या क्षणांचे

ते ज्ञान क्षणभंगुर ठरते. 

याला उपाय म्हणजे सतत सत्संग, अभ्यास, त्यावर चिंतन आणि त्याप्रमाणे वर्तन …. सद्वर्तन. 

हे एकट्याने करतांना दुबळाई वाटते, आळस डोकावतो, हातून सहज होत नाही, म्हणून 

श्री रामदासांनी मनाच्या एकांत साधने बरोबरच समाज बांधणीचा सामुदायिक कार्यक्रम सांगितला.

त्यावेळी आवश्यकअसलेली राष्ट्र उभारणी केली.  

ते सर्व करण्याची  गरज आजही आहे, चिरंतन आहे. मागील पाठमालांमध्ये आपण हे विस्ताराने 

पाहिले.  स्वामीजी लिखित योग ग्रंथावरील हि नवीन पाठमाला सुरु होत आहे. 

आपला जीवनातील साधक म्हणून क्रमविकास आपापल्या ध्येया  प्रमाणे करण्यासाठी जी 

जीवनशैली साधकांना उपयुक्त आहे या विषयी मार्गदर्शन योग ग्रंथात मनशक्ती केंद्राचे संस्थापक

स्वामी विज्ञानानंद करतात   

शक्ती आणि शांती  याचा मेळ जीवनात आवश्यक असतो. त्यावर ध्यान हा उपाय आहे. 

शरीर आणि मनाचे संतुलन साधणारी "शरीराशी संवाद" हि ध्यान पद्धती देखील योग ग्रंथात 

आपल्याला शिकायला मिळते. 

हे सर्व विषय आपण क्रमाने या पाठमालेत अभ्यासण्याचा प्रयत्न करणार  आहोत, त्यावर चिंतन

 करणार आहोत. यापुढील काही पाठ यासंबंधी आवश्यक अशा प्राथमिक माहिती / तपशिलाचे

 होतील. त्यातील हा सुरवातीचा पाठ !


तत्सत ब्रह्मार्पण मस्तू I I   हरी ओम !!


विजय रा. जोशी. 




 

 

महाशिवरात्री निमित्त विशेष पाठ.


वरील लिंकवर क्लिक करा. ऑडिओ सुरु होईल. 





२०० वर्षाच्या ऋषीतुल्य व्यक्तीला घडलेले दर्शन.


अग्निलिंगाचे रूपांतर शिवलिंगात झाल्याचा एक आगळा अनुभव देवजीबाबांना आला. 

त्यानंतर एक अभूतपूर्ण शिव दर्शन त्यांना घडले. आणि २०० वर्षाचा तो जीव श्रांत झाला.

हे दर्शन कसे घडले, त्यामागे त्यांची किती दुर्दम्य इच्छाशक्ती होती, 

त्यासाठी त्यांनी काय केले, 

स्वामीजींनी त्यांना कोणते मार्गदर्शन केले ,   याचा रोमांचकारी प्रत्यय      


'शिवदर्शन'.


विजय रा. जोशी. 

(महाशिवरात्री , ८ मार्च २०२४). 


Saturday, March 2, 2024

प्रेरणा दिन पाठ , २१ फेब्रुवारी, २०२४. 


वरील निळ्या रंगाच्या ओळीवर क्लीक केले कि पाठ ऑडिओ ऐकता येईल. 






हरी ओम. 

मनशक्ती केंद्राचे संस्थापक आणि प्रथम चिंतक स्वामी विज्ञानानंद यांनी २१ फेब्रुवारी १९६३ या दिवशी , सन्यास मार्ग स्वीकारला. स्वामीजींनी अनेक साधकांना अर्थपूर्ण जीवनासाठी मार्गदर्शन केले, पण त्यांनी स्वतःला रूढार्थाने "गुरु" म्हणून मानले नाही. कोणाचा खाली वाकून नमस्कार स्वीकारला नाही.  १९९३ मध्ये त्यांनी प्रकाश समाधी घेतली. पण दर्शनार्थ त्यांनी स्वतःचे कॊणतेही प्रतीक ठेवले नाही. 

स्वामीजींच्या शिकवणुकीने , त्यांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानाच्या आधारे आज पर्येंत हजारो साधकांचे जीवन सन्मार्गी लागले आहे. मनशक्ती केंद्र २१ फेब्रुवारी हा दिवस (सत्कार्याची) प्रेरणा दिवस म्ह्णून मानतात. व स्वामीजींच्या शिकवणुकीतून नवीन कार्य प्रेरणा घेतात. 

या विशेष प्रसंगी घेतलेले हे विवेचन सर्वांस प्रेरणा दायी ठरेल अशी खात्री आहे. 


विजय रा. जोशी. 

Tuesday, November 28, 2023

 पसायदान पाठ :  ४/१०/२०२३. 


पसायदान : माउलींचा उद्देश काय आहे ?    माणसाचा क्रम विकास !




अगोदर आपण गीता पाठ केले, मनाचे श्लोक सविस्तर समजून घेतले. आणि आता पसायदानाचा संदेश
 
विस्ताराने पाहात आहोत.  या सर्वांचा उद्देश काय आहे? हे आपले सांगणे, ऐकणे जर आपल्याला
 
सार्थकी  लावायचे  असेल  तर आपण  कोनत्या   दृष्टीने या सर्व गोष्टींकडे पहायला पाहिजे ?

 स्वामीजींनी आपल्याला यज्ञ प्रार्थना दिली. ती अशी :

वयं हवनं करिष्या महे I अस्मात  अती लोभम हर I 

गुणां स्मरामी , त्वाम शरणम अहं प्रपद्ये. I        आत्म ज्ञानायच  त्वाम शरणम अहं प्रपद्ये II 

आम्ही हवन करतो. आमच्या मधील दोष कमी  होवो. आमच्यातील गुण वृद्धिंगत होवो. त्या साठी आम्ही तुला

(अग्नी /प्रकाश देवतेला) शरण येतो.    आत्मज्ञान होवो, त्यासाठी आम्ही तुला शरण येतो. 

आणि या पार्थने नंतर प्रकाश प्रार्थना / ज्योती ध्यान याचा संदेश सविस्तर आहे. 

अखिल मानवतेचा कळवळा, सर्व भूत मात्रांबद्दल जिव्हाळा, सर्व कल्याणाची आस माउलींच्या चित्तात

जी आहे त्ती ज्ञानेश्वरीमध्ये अनेकदा दिसून येते. त्यासाठी मानवाच्या वर्तनातील बदल  महत्वाचा आहे

हे जन-मानसावर ठसवितांना  सद्गुणांचे पालन करणे आवश्यक आहे त्याचे प्रतिपादन त्यांनी

ज्ञानेश्वरीत अनेकदा केले आहे. 

सद्गुणांचा विकास समाजात व्हावा, सत्यस्वरूप परमेश्वराचा महिमा वाढावा, याची ज्ञानदेवांस तळमळ

होती. त्यांनी या गुणांचे वर्णन करतांना आपला सारा अनुभव या ओव्यांत ओतला आहे. मराठी भाषा

बोलणाऱयांवर त्यांचे हे अनंत उपकार आहेत. 

लोकात, समाजात मैत्र निर्माण का होत नाही ?

मनुष्य जेव्हा इतरांना ते आपल्या सुखाचे साधन आहेत अशा दृष्टीने पाहू लागतो तेव्हा त्याची

निराशा होते. माणसा-माणसा मधले फार मोठे दुःख हे इतरांना आपल्या सुखाचे साधन समजल्यामुळे

निर्माण झालेले असते. मग नवीन मॉडेलची मोटार आणि सुंदर दिसणारी बायको यांना एकच दर्जा

प्राप्त होतो. 

अशा मनोवृत्तीमुळे ज्यांना साधन समजले जाते त्यांना आपल्या वासनांसाठी राबवितांना आणि

त्यांच्यावर अन्याय करतांना माणसाला काहीच वाटत नाही. त्यामुळे ज्या व्यक्ती अशा साधन होतात,

त्यांच्या जीवनात दुःख निर्माण होते. आणि साधन समजल्या गेलेल्या व्यक्ती आपल्या सुखाच्या

अपेक्षा पूर्ण करीत नाहीत तेव्हा आपल्या जीवनात देखील  दुःख निर्माण होते. 


लोकांना आपले साधन समजण्याची माणसाची मनोवृत्ती अत्यंत सूक्ष्मपणे कार्य  करीत असते.  लोकांनी आपल्याला

चांगले समजावे, लोकांनी आपल्याला शहाणे समजावे, असे त्याला वाटते. त्याचे गुण इतरांच्या लक्षत येऊ नयेत

त्याचे त्याला वाईट वाटते. आणि आपण लोकांसाठी एवढा त्याग, कष्ट करतो पण लोकांनी आपल्यास जेवढे

मानायला पाहिजे तेवढे ते आपल्यास मानत नाहीत याचा त्याला खेद होतो, चीड येते आणि लोक वाईट, दुष्ट, कृतघ्न

आहेत असा तो निर्णय आपल्या मनाशी घेतो. पण दुसऱ्याचा तो त्यांच्या बाजूने  विचार करील तर त्याला आपली

चूक लक्षत येईल.  आपल्यासाठी सर्व  आहेत, आपण जगाचे केंद्र आहोत आणि जग आपल्याला सुख देण्यासाठी

देवाने निर्माण केले आहे - असे माणसाने समजू नये.  

संत आपल्यास हेच सांगतात. म्हणून ते म्हणतात - खरे सुख हे आपले आपणच शोधायचे असते. ते आपल्यातच

असते. आत्मसुखाचे साधन जर इतर लोकांना मानले तर सुख कधीही मिळणार नाही. ते म्हणतात - माणसाने

कुणाला आपले समजू नये, या जगात कुणी कुणाचे नाही. 

हा जो विचार आहे तो अशा उच्च अध्यात्मिक भूमिकेवरून आहे. आणि माझे माझे करून  इतरांत गुंतू नये याचा

अर्थ प्रेम करू नये असं नाही . प्रेम करणे आणि प्रेमात गुंतणे हे दोन वेगळे प्रकार आहेत.  पहिले व्यापक

 आत्म्यावरील प्रेमाचे दर्शक आहे तर दुसरे विषयाच्या आसक्तीत अडकणे आहे. 

“भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे” या प्रार्थनेतील अर्थ अशा दृष्टीने व्यक्ती आणि समष्टी यांच्या कल्याणाच्या दृष्टीने

माउलींना अभिप्रेत आहे , तो आपण लक्षात घेतला पाहिजे. 

आपण पसायदानाचा अभ्यास करून काय साधायचे आहे ? 

आपल्यातील खलत्व गेले का ? 

आपल्याला जे हवे असते ते म्हणजे 

अखंड असणे ., अस्तित्व. 

ज्ञान, माहिती, समजून घेणे 

सुख, समाधान, आणि  शांती. 

त्यासाठी सत चित आनंदरूप आत्म्याशी, परमेश्वराशी आपण एकरूप झाले पाहिजे. 

असे  उपनिषदे, गीता सांगतात.  

आणि ते आपल्यास सर्व प्राप्त व्हावे यासाठी , आपल्यात चांगला बदल घडविण्यासाठी  ज्ञानेश्वर माउली

आपल्याकडे पसायदानात मागतात : 

जे खळांची व्यंकटी सांडो, त्या सत्कर्मी रती वाढो. 

हे मागणे  त्यांच्या गुरूंकडे, परमेश्वराकडे आणि आपल्याकडे ( श्रोत्यांकडे ) करतात. 

त्यासाठी आपण जर आत्मपरीक्षण केले आणि स्वतःतील खलत्व कमी केले तर 

जे आपल्याला पाहिजे ते मिळेल. माणसाचा पारमार्थिक क्रम विकास होईल. 


विजय रा. जोशी.